जळगाव : जळगावच्या यावल तालुक्यात किनगाव नजीक जवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला यात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांवरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची वर्दी मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.




