मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी करण्यात आली.
बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू झाला. एक टीम विधीमंडळाच्या सचिवालयातही तपास करत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यातील काही नेते मंडळींना धमक्यांचे फोन आले होते. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली होती.
पोलिसांनी सांगितले कि, फोन येताच पोलिसांनी मंत्रालय आणि विधीमंडळाच्या सचिवालयाला घेराव घातला असून दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे. फोन कुठून आला आणि कोणी केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे स्वतंत्र पथक करत आहे. बॉम्ब संदर्भातली माहिती ही बनावट असल्यास कायदयानुसार फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन कारवाई केली जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर त्या व्यक्तीला माहिती कशी मिळाली याची चौकशी केली जाईल. तसेच माहिती देऊन मोठे संकट टाळल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीचा उचित सन्मान केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.




