सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर होते.
कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ते म्हणाले, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मराठा आरक्षणावरुन समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.
काय आहे प्रकरण ?
‘सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं, असं सावडी म्हणाले होते.




