अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डबा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाला आहे.
पुण्याला जाणाऱ्या अनेक महत्वाच्या गाड्या या मार्गावरूनच धावत असतात, परंतु, या अपघातामुळे पुण्याकडून येणारी आणि पुण्याला जाणारी वाहतूक अनिश्तिच काळासाठी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेचा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. कल्याण ते कर्जत दरम्यानच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. बदलापूर लोकल उल्हासनगर स्थानकावर थांबवण्यात आली आहे.
तसेच ट्रेन १८५२० विशाखापट्टणम एक्सप्रेसही अंबरनाथ स्थानकावरील सिग्नलवर थांबवण्यात आली आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. रुळावरून घसरलेला डबा रुळावर आणून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.