जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप व्यक्त केला आहे. आतंकवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांचे प्राण घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वन दिले. त्यांनी कुटुंबांना आर्थिक मदतीसह सरकारी नोकऱ्याबाबत आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार राज्य मंत्रिमंडळाने आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगाममधील या हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.