ठाणे : देवपूजा करताना दिव्याची पेटती वात अंगावर पडल्याने एक ४८ वर्षीय महिला गंभीररित्या भाजली. तत्काळ रुग्णालयात दाखल करूनही उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्चना धर्मेंद्र कुमार (वय ४८) असे या मयत महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
शनिवारी सकाळी अर्चना कुमार या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे देवपूजा करत होत्या. पूजा पूर्ण केल्यानंतर त्या दिवा ओवाळण्याच्या तयारीत होत्या. याच वेळी, दिव्यातील पेटती वात अचानक त्यांच्या अंगावर पडली. यामुळे त्यांच्या अंगावरील कपड्यांना तात्काळ आग लागली. अंगावर तलम कपडे असल्याने आगीने झपाट्याने पेट घेतला आणि काही क्षणांतच अर्चना संपूर्णतः आगीत वेढल्या गेल्या. या आकस्मिक घटनेमुळे त्यांना स्वतःला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. त्यांच्या किंकाळ्या ऐकून घरातील आणि शेजारील लोकांनी तत्काळ धाव घेतली.
अर्चना यांना गंभीर अवस्थेत तातडीने कल्याण पूर्वेतील काका ढाबा परिसरातील जानकी ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले. जानकी ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि त्यांना पुढील उच्च उपचारासाठी तत्काळ अन्य ठिकाणी नेण्याचा सल्ला दिला. यानुसार, अर्चना यांना डोंबिवली एमआयडीसीतील डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अर्चना यांची प्रकृती सतत खालावत गेली. त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले होते. अखेर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर अर्चनाचे पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.