मुंबई : राज्यात पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर पुणे, लगतच्या अहमदनगर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान, ३० सप्टेंबर राेजी संपणाऱ्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे.




