भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.
नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका केली होती. दसरा मेळाव्यातील भाषणात एकाही विकास कामाचा उल्लेख नाही, कोरोनामुळे जवळपास 43 हजार रुग्ण महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यावर टीका करताना पुळचट, निर्बुद्ध अशी भाषा वापरुन शिवसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. त्यामुळे नारायण राणे यांच्याविरोधात भांदवि कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रारी अर्ज दिले होते. जर गुन्हा दाखल केला नाही, तर 2 नोव्हेंबरला नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल, असा इशारा आंधळकर यांनी दिला होता. त्यांच्या या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलीस स्थानकात भांदवि कलम 504, 506 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री पद दिलं होतं. बाळासाहेबांनी राणे यांच्यावर अनेक उपकार केले होते. राणेंमुळे शिवसेना वाढण्यास मदत ही झाली असेल. मात्र अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं शिवसैनिकांना खपणारं नाही. यासोबतच सामान्य जनता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत टीका करणं हे निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केला.” अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे.




