मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता मेटे यांच्या ड्रायव्हरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विनायक मेटे यांची गाडी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीपुढे ट्रॉलर होता. नियमानुसार ट्रॉलर शेवटच्या लेनमधून चालला पाहिजे, पण तो मधल्या लेनमध्ये चालत होता. त्यामुळे विनायक मेटे यांच्या गाडीला ओव्हरटेक करता येत नव्हते. मेटे यांच्या चालकाने अखेर तिसऱ्या लेनमध्ये जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही एक वाहन समोर होते. तेव्हा मेटे यांच्या चालकाने ट्रॉलर आणि त्या वाहनाच्या मध्ये असलेल्या थोड्या जागेतून कार काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे विनायक मेटे आणि त्यांचा अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते, त्या बाजूला ट्रॉलरची जोरदार धडक बसली. त्यामुळे विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाने अपघातानंतर चुकीची माहिती दिल्याचे सभागृहात स्पष्ट केले. मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या चालकाने सर्वप्रथम ११२ नंबरवर फोन केला, हा फोन नवी मुंबई पोलिसांना फॉरवर्ड करण्यात आला. तेव्हा चालकाने आम्ही बोगद्यापाशी असल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलीस तातडीने त्याठिकाणी आले तेव्हा बोगद्यापाशी कोणीही नव्हते. पोलिसांनी बोगद्याच्या दुसऱ्या बाजूलाही जाऊन बघितले. पण तिकडेही कोणीच नव्हते. आता चालकाचा तो फोन खरा होता की खोटा, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
त्यानंतर रायगड पोलिसांना कळवण्यात आले. रायगड पोलीस अपघातस्थळी पोहोचले तेव्हा मेटे यांची गाडी बोगद्यापासून बरीच लांब होती. मेटे यांच्या गाडीचा चालक भांबावला होता की माहिती नाही. पण त्याने दिलेली माहिती चुकीची होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यादरम्यान एक गाडी रस्त्यातून जात होती. त्यांनी मेटेंच्या गाडीचा अपघात झाल्याचे आयआरबीला कळवले. त्यानंतर आयआरबीची रुग्णवाहिका अवघ्या ७ मिनिटांत त्याठिकाणी आली आणि मेटे यांना घेऊन गेली. मात्र, तोपर्यंत विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.




