कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. २२ आणि २३ फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवल्याने यात्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने या यात्रा भाविकांविना करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच माघी यात्रेवरही भाविकांसाथी निर्बंध लावण्यात आले आहेत.




