पुणे : शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, तालुक्याच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. वळसे-पाटील म्हणाले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. समाजामध्ये सामाजिक सलोखा राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी.
राज्यातील सहकारी सोसायट्या या केवळ पीक कर्ज वाटप करणाऱ्या न राहता त्याद्वारे नागरिकांना विविध प्रकारच्या आवश्यक सेवा पुरविता आल्या पाहिजे, याकरीता नियमात आवश्यक ते बदल केले जातील. गावाची सेवा सोसायटी हा आर्थिक कणा असून या संस्थेमधे काम करणारे संचालक, सचिव हे उच्च गुणवत्ताधारक आणि प्रशिक्षित असावेत. सहकारी संस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री वळसे -पाटील पुढे म्हणाले, कुकडी, घोड, मीना नदीवरील ६५ बंधाऱ्यांना कुकडी प्रकल्पामधुन कायम स्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच राज्यात पाऊस लांबल्याने परिस्थिती गंभीर असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन मंत्री वळसे पाटील यांनी केले.
सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील टाकळी हाजी – कवठे यमाई जिल्हा परिषद गटातील कवठे यमाई -फाकटे व म्हसे आण्णापुर या घोडनदीवरील दोन मोठ्या पुलासह कवठे संविदणे, कवठे – लाखनगाव , माळवाडी – भैरवनाथवाडी टाकळी हाजी रस्ता, वडनेर येथील नळ पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
शिरुर तालुक्यातील कवठे, म्हसे बुद्रुक, माळवाडी आणि वडनेर बुद्रुक येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनिता गावडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, कवठे येमाईच्या सरपंच सुनिता पोकळे, म्हसेचे सरपंच सौरभ पवार, वडनेरच्या सरपंच शिल्पा निचित, आण्णापुरचे सरपंच किरण झंजाड आदी उपस्थित होते.




