अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला हिंदुत्वाची नौटकी करायची आणि दुसरीकडे हिंदुत्व गुंडाळून ठेवायचे असे चित्र शिवसेनेचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असतांनाही ते औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे बदलू शकले नाहीत. एकप्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला आहे. मुळातच शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना त्यांचे हिंदुत्व समजेनासे झाले आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही. प्रत्येकवेळी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घेतला जाणारा आधार आता फार काळ चालणार नाही, राज्यातील जनतेला कृती हवी आहे, ज्या तत्वासाठी शिवसेना सत्तेवर आली, त्या मूळ हिंदूत्वाच्या तत्वालाच त्यांनी गुंडाळून ठेवले आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारने सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत. शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही व औवेसींसारख्या लोकांनी त्यांचे गोडवे गायले तर तो सरकारचा तारणहार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असेही विखे पाटील पुढे म्हणाले.




