चंद्रपूर : चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदी पुलावर अनेकजण उभे होते, परंतु, कोणाला काही समजण्याच्या आतच या तरुणाने नदीत उडी घेतल्यामुळे कोणाला काहीही करता आले नाही. सध्या या तरुणाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही घटना वर्धा नदीच्या बेलोरा पुलावर सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण दुचाकीने त्या पुलावर आला. त्याने दुचाकी पुलावर उभी केली आणि क्षणभरात नदीपात्रात उडी घेतली. पुलावर असलेले लोक त्याला आवाज देत राहिले आणि तो काही क्षणात खोल पाण्यात बुडू लागला. राजशेखर पोचम गोदारी असं मृत तरुणाचं नाव आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिवसभर नदीपात्रात राजशेखरची शोधाशोध केली. मात्र, नंतर अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.
काही नागरिकांनी हा सम्पूर्ण प्रकार बघितला, या प्रत्यक्षदर्शींमध्ये एक व्यक्ती राजशेखर गोदारी याला ओळखत होती. त्याने तात्काळ राजशेखरने नदीत उडी घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरु केली. पोलिसांनी राजशेखरची दुचाकी ताब्यात घेतली आहे. आज पहाटेपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याचा मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती आहे.
वेकोलि वणी क्षेत्राच्या बेलोरा नायगाव कोळसा खाणीत मागील काही वर्षांपासून राजशेखर पोचम गोदारी हा डंपर ऑपरेटर पदावर कार्यरत होता. सोमवारी दुपारी एक वाजताचा दरम्यान तो वर्धा नदीच्या बेलोरा पुलावर आपल्या दुचाकीवर आला. त्यानंतर त्याने दुचाकी बाजूला लावून क्षणाचाही विचार न करता लगेच नदीत उडी घेतली.




