पुणे : करोनामुळे दोन वर्षे ‘सायलेंट’वर गेलेली गणेश विसर्जन मिरवणूक यंदा ‘कर्णकर्कश्य’ आणि कानठळ्या बसविणारी ठरली. मिरवणुकीच्या दोन दिवसांत लक्ष्मी रस्त्यावर उच्चांकी आवाजाची नोंद झाली. ढोल-ताशांचा दणदणाट आणि स्पीकरच्या भिंती निर्बंधमुक्त असल्याने काही चौकांमध्ये आवाजाच्या पातळीने ‘अतिधोकादायक’ची पातळी गाठली.

आवाजाची पातळी जाणून घेण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी यंदाही लक्ष्मी रस्त्यावर ठाण मांडून सलग चोवीस तासांच्या आवाजाच्या नोंदी घेतल्या. हा अहवाल शनिवारी सादर करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीपूर्वी दर वर्षी प्रशासनातर्फे प्रत्येक मंडळाने किती स्पीकर वापरायचे, पथकातील ढोल-ताशांची संख्या किती असावी, याबद्दल पोलिस, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पथकांच्या बैठका होतात. मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नियमावली जाहीर केली जाते. यंदा बैठकांमध्ये निर्बंधांची नियमावली जाहीर झाली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषण लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
पाहणीमध्ये सुयोग लोखंडे, जयवंत नांदोडे, समय पाठक, सर्वेश कोळेकर, शिवकुमार वारकड, योगेश क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवला. अंकिता महाजन, गौरी जाधव, अनुष्का पाटील, सेहल गुडल, श्रेया इंगळे, शिल्पा मांदळे आणि जयश्री मिसाळ यांनी आकडेवाडीचा निष्कर्ष काढण्यास मदत केली. या विधायक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विनीत, आदित्य लंके, युवराज चव्हाण आणि मनोज राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर यंदा स्पीकरच्या भिंती आणि ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचे वादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील उच्चांकी आवाजाची नोंद झाली. काही भागात आवाजाची पातळी ‘अतिवाईट’पर्यंत पोहोचली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या मर्यादेच्या दुपटीहून जवळपास होती.
महत्त्वाची निरीक्षणे
– सर्वांत कमी आवाजाची पातळी (६४ डेसिबल) शुक्रवारी सायंकाळी चार वाजता खंडुजीबाबा चौकात नोंदवली.
– सर्वाधिक म्हणजेच अतिधोकादायक आवाजाची पातळी शनिवारी सकाळी आठनंतर खंडुजीबाबा चौकातच नोंदवली.
– सलग सर्वाधिक आवाज कुंटे चौकामध्ये नोंदवला गेला.
– कुंटे चौकात आवाज कायमच १०० डेसिबलच्या पुढे होता.




