काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी शदेखील व्यक्त केली जात आहे. त्यातच काबूल विमानतळावरील गोंधळादरम्यान एका अफगाण मुलीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत भारतीयांचे एअरलिफ्ट पण सुरू आहे. हवाई दलाच्या सी -130 जे विमानाने 85 भारतीयांना घेऊन काबूल विमानतळावरून आज सकाळी 10.30 वाजता उड्डाण केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आणखी 200 भारतीयांना आणण्याची तयारी केली जात आहे, यासाठी हवाई दलाचे सी -17 विमान स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या सर्व अधिकाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे, परंतु काबूलसह इतर शहरांमध्ये सुमारे 1000 भारतीय अडकल्याचा अंदाज आहे. परराष्ट्र मंत्रालय त्यांचे स्थान आणि स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सर्व लोकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधलेला नाही.
काबूलमधून भारतीयांना हवाई दलाच्या विमानांमध्ये आणले जात आहे. मंगळवारी 120 पेक्षा जास्त लोक ग्लोबमास्टर C-17 ने देशात परतले होते. यामध्ये काबूलमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी, आयटीबीपीचे कर्मचारी आणि इतरांचा समावेश होता. यापूर्वी सोमवारीही 45 लोकांना विमानातून हलवण्यात आले होते.




