नवी दिल्ली : इंग्लंड-न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला, त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी सोमवारी मिडल ईस्ट आयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत सध्या जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवत आहे, कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे.
इंग्लंड-न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द करण्याबाबत इम्रान खान म्हणाले की, मी पाकिस्तान-इंग्लंड क्रिकेट संबंध जवळून पाहिले आहेत. मला वाटते की इंग्लंडमध्ये अजूनही अशी भावना आहे की ते पाकिस्तानसारख्या देशांबरोबर खेळून एक प्रकारे उपकार करत आहेत. पण ते भारतीय संघासोबत असे करण्याची हिम्मत करू शकत नाहीत कारण बीसीसीआय आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि यामुळे त्यांचे वर्चस्व आणि दर्जा खूप जास्त आहे.
इम्रान खान पुढे म्हणाले कि, “जरी मी इंग्लंड दौरा रद्द करण्याबद्दल बोललो नाही, इंग्लंडने अधिक चांगले वागावे अशी माझी अपेक्षा होती. ते म्हणाले की, एका भारतीयाने सिंगापूरमधून बनावट बातम्या पसरवल्या आणि त्या खऱ्या असल्याचे समजून संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला. इंग्लंड आणि न्यूझीलंडने हे समजून घेतले पाहिजे की जर इतर कोणत्याही संघाने त्यांना अशीच वागणूक दिली असती तर त्यांची काय अवस्था झाली असती.
ते पुढे म्हणाले कि, “पैसा आता मोठा खेळाडू बनला आहे. हे फक्त खेळाडूंसाठीच नाही तर क्रिकेट बोर्डांसाठीही लागू आहे आणि पैसा भारतात आहे. म्हणूनच भारत सध्या जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवत आहे. त्यांना जे हवं असतं ते ते करतात. ते जे काही बोलतात, तेच घडते. इंग्लंड-न्यूझीलंडसारखी गोष्ट भारतासोबत कोणीही करू शकत नाही, कारण त्यांना माहित आहे की ते बीसीसीआयला नाराज करू शकत नाहीत.”




