रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
82 व्या वर्षी जेव्हा निवृत्ती घ्यायची त्या वयातही न थांबता अविरत काम करणारे रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने-नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.




