मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांचे ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केले. जयंत सावरकर यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते शोक व्यक्त करत आहेत.
३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसले होते. शिवाय ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विशेष गाजली.