मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी आज सांगितले. कोरोनाची दुसरी लाट सौम्य असेल असा अंदाज होता पण हा अंदाज चूकला. राज्यातील स्थिती आज गंभीर आहे. त्यामुळेच कडक लॉकडाऊनची गरज असून व्यापारी व छोट्या दुकानदारांचाही विरोध आता मावळत चालला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. लोकल, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू याबाबत सर्वंकष विचार करून अंतिम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.




