पुण्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील करोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विषेश जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी या वेळी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, करोनाचे रुग्ण आणि मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तपासणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना चाचणीचे अहवाल रुग्णांना परस्पर न देता महापालिके ला द्यावेत. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.




