नवी दिल्ली : आंतरराज्य प्रवासासाठी RT-PCR चाचणी करणे अनिवार्य नसल्याची सूचना इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जारी केली आहे. ही सूचना पूर्णपणे स्वस्थ असलेल्या नागरिकांसाठीच आहे. मात्र, ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत, त्यांनी प्रवास टाळावा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टेस्ट लॅबवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे.
एकदा RT-PCR किंवा RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची दुसऱ्यांदा चाचणी करू नये, असे देखील ICMR ने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. यामुळे टेस्ट लॅबवरील ताण कमी होईल व टेस्ट रिपोर्ट वेळेवर मिळण्यास मदत होईल. यामुळे आंतरराज्य प्रवास देखील सोपा होईल. नवीन आदेशानुसार ज्यांना कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षण नाहीत, त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. हा नियम बस, ट्रेन आणि विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी लागू असेल. ICMR ने अत्यावश्यक सेवा वगळता आंतरराज्य प्रवास टाळण्याचा देखील सल्ला दिला आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहे, अशा लोकांनी प्रवास टाळावा. सर्व प्रवाशांना कोव्हिड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य आहे. दरम्यान, काही राज्यांनी लॉकडाऊन दरम्यान प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य केले आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारच्या डिस्चार्ज धोरणानुसार, हॉस्पिटलमधून घरी सोडताना कोरोना रुग्णांची पुन्हा चाचणी करणे आवश्यक नसेल. सध्या देशात RT-PCR, TrueNAT, CBNAAT आणि अन्य प्लॅटफॉर्म्सवरील एकूण २५०६ टेस्ट लॅब आहेत. येथे तीन शिफ्टमध्ये दररोज १५ लाख चाचण्या होत आहेत. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह वेळेवर टेस्ट रिपोर्ट देण्याचा दबाव देखिल लॅब्सवर आहे. आयसीएमआरने चाचण्या वाढविण्याचा सल्ला दिला आहे व सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये यासाठी परवानगी देण्यास सांगितले आहे.




