पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे देण्यात आले. भारतीय संघात श्रेयस अय्यर जखमी असल्यामुळे ऋषभ पंतला संधी दिली. भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. शिखर फक्त ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. परंतु, विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने फक्त २८ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने वनडेतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने ११४ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ११४ धावा केल्या. पंत ४० चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. त्याने ७ षटकार आणि ३ चौकार मारले.
दरम्यान विराटने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत सर्वात कमी डावात १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.




