केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या एक वर्षात सर्व टोलनाके हटवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जितका ते रस्त्याचा वापर करतील.
अमरोहा येथील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझा असण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, मागील सरकारच्या रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये असे अनेक टोल प्लाझा बांधले गेले आहेत. हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे. ते पुढे म्हणाले की, आता जर हे टोल प्लाझा हटविण्यात आले, तर रस्ता बनविणारी कंपनी भरपाईची मागणी करेल. पण सरकारने पुढच्या एका वर्षात देशातले सर्व ‘टोल’ हटवण्याची योजना आखली आहे.
गडकरी म्हणाले की, टोल संपविणे म्हणजे टोल प्लाझा संपवणे. आता सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करीत आहे ज्यामध्ये, जिथून आपले वाहन महामार्गावर चढेल, तेथून जीपीएसच्या मदतीने कॅमेरा आपला फोटो घेईल आणि आपण महामार्गावरुन उतरतानाचा फोटो घेईल. त्यामधील अंतर जितके असेल तितकाच टोल आपल्याला भरावा लागेल.




