मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे कोरोना रुग्णांच्या संख्येवर अवलंबून आहे. सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. पुढील १५ दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास लोकल ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल केले जातील आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल.’
सध्या मुंबईतील लोकल ट्रेन सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अनेक मुंबईकर या वेळमर्यादेमुळे त्रस्त आहेत. कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सर्वसामान्यांना ट्रेनचे वेळापत्रक पाहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश काकाणी यांनी दिलेली माहिती काहीशी दिलासादायक मानली जात आहे.




