नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी आज पार पडली. रॅलीवेळी झालेल्या हिंसाचाराचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेला हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. परंतु, ‘आम्ही या प्रकरणात दखल देणार नाही, सरकारला योग्य ती कारवाई करू द्या. आम्हाला समजलं आहे की सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. कायदा आपलं काम करेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्यही आम्ही पाहिलं आहे’, असं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यान म्हटलं.
२६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. हिंसाचारासाठी आणि तिरंग्याचा कथित अपमान केल्याबद्दल जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असं या याचिकेत म्हटलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात न्यायालयीन चौकशीला नकार दिला आहे.




