रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. आता यावर स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
सोशल मीडियावर फिरत असलेला तो फोटो पाच वर्ष जुना असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले कि, “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल देखील राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं”.




