नगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. तसेच विखे पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की सहकार निःपक्ष असतो. `देह वेचावा कारणी` या नावात मोठा अर्थ आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की शेतीत काैशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मनात हा प्रश्न उगीच नाही आला. त्यामागे मोठा त्याग आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे दुःख स्वतः पाहिले. अनुभवले. सहकार वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. नगर जिल्ह्यात ऊसाचे मोठे उत्पादन होते. शेतीची क्रांती, दुधाची क्रांती गुजरातमध्ये झाली. गहू हरिणाना, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला. हेच माॅडेल देशाला पुढे घेऊन जाणार आहे, असे मोदी यांनी सांगून सहकार क्षेत्राचा गाैरव केला.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या अनेक भागात मंत्रिपदाच्या काळात काम केलं. ज्या काळात ग्रामीण भागांत शिक्षणाची चर्चाही होत नव्हती, अशा काळात त्यांनी शिक्षण संस्था सुरु केल्या. साखर उद्योगला चालना दिली. शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले, शेतकऱ्यांची उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नव्या जुन्याचा मेळ घालून शेती केली पाहिजे. इथेनॉलचा वापर जसाजसा वाढेल तसा तेलासाठी बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांना मिळेल, हे त्यांनी दाखवून दिलं.’




