मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने 1 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 31 जुलै रोजी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता आणि अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, नवीन चिन्ह पक्षासाठी नवी क्रांती घडवू शकते. ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बाब अत्यंत चुकीची आहे, मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राजकीय पक्षाच्या आयुष्यात निवडणूक चिन्हे गोठवण्याचे प्रकार घडतात. काँग्रेससोबतही असे तीनदा झाले आहे. जनता पक्षाबाबतही ते झाले होते. नवे निवडणूक चिन्ह पक्षासाठी नवी क्रांती आणि नवा सूर्य आणू शकेल, असे राऊत म्हणाले.




