नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आजेसासुचा अंत्यविधी करून घरी आल्यानंतर कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागून नातसुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात हा प्रकार घडला. आकांक्षा कचवे यांच्या आजीसासू सुलकनबाई कचवे यांचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अंत्यविधी आटोपून घरी परतल्यानंतर आकांक्षा काम करत होती. त्यानंतर ती कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता तिला विजेच्या तारेचा शॉक लागला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दीड वर्षांपूर्वीच आकांक्षाचा विवाह झाला होता.




