मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात १ हजार ००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख १३ हजार ५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख ०३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६६ हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०९ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ४५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.




