संगमनेर : उंबरी-शेडगाव या गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आर.आर.पाटील यांना संबंधित गावातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. या कामाच्या निविदा निश्चित झाल्या असतानाही, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामस्थांची होणारी अडचण दूर करण्यासाठी हे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजयुमाचे जिल्हा सचिव सचिन शिंदे, रविंद्र गाडे, अशोक फड आदींनी या मागणीचे निवेदन अभियंत्यांना सादर केले.
संबंधित पुलाचे काम घेतलेले बांधकाम व्यावसायिक हे राजकारणातील मोठ्या नेत्याच्या जवळील असल्याने अधिकारी त्यांना पाठीशी घालतात का? असा सवालही ग्रामस्थांनी अभियंत्यांशी चर्चा करताना उपस्थित केला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पूर आल्यास या कामास पुन्हा विलंब होईल. त्यामुळेच या कामाची तातडीने सुरुवात होणे अत्यंत गरजेचे असून, ठेकदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने या कामात होत असलेला हलगर्जीपणा हा ग्रामस्थांच्या गैरसोयीचा ठरत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला. या मागणीचे निवेदन उपभियंता श्री.तांबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
राजकारणाशी संबंधित ठेकेदार आपल्या सोयीनुसार कामे घेवून त्यास जाणिवपूर्वक विलंब करतात. हीच भावना सर्वसामान्य नागरीकांची झालेली आहे. त्यामुळे नागरीकांच्या मागणीचा गांभिर्याने विचार करुन या पुलाच्या कामास तातडीने सुरुवात करावी आणि कामास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने बांधकाम विभागाकडे केली आहे.




