बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर रत्ती गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. काल (३० जून) सायंकाळी उशिरा या मुलीचा मृतदेह सापडला. मृत मुलीचे नातेवाईक जवळच्या गावात लग्नासाठी गेले होते. ही 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी तिच्या आजोबांबरोबर थांबली होती. ही मुलगी अकरावीची विद्यार्थिनी होती. रात्री मुलगी घरात झोपली होती, तर तिचे आजोबा घराच्या बाहेर दरवाजाजवळ झोपले होते. दरम्यान, पाच तरुणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि मुलीला जबरदस्तीने पळवून नेले. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. परंतु, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस येईल, या भीतीने त्यांनी पीडित मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला.
सकाळी बराच उशीर झाला तरी मुलगी बाहेर आली नाही तेव्हा तिच्या आजोबांना चिंता वाटायला लागली. तिच्या आजोबांनी शेजाऱ्यांना याबद्दल सांगितले. शेजार्यांनी घराचा दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी पाहिले की घराची खिडकी फोडलेली होती आणि आत कोणीच नव्हते. त्यानंतर सर्वांनी गावात सर्वत्र मुलीचा शोध सुरू केला. थोड्या वेळाने त्यांना या मुलीचा मृतदेह झुडपात पडलेला आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाले की अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे.
दरम्यान, मुलीच्या आजोबांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात पाच जणांची नावे समोर आली. पोलिसांनी त्यातील तीन आरोपींना अटक केली असून दोघे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.




