एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना पार पडला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारत १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. भारताने इंडिजसमोर पूर्ण ५० षटके खेळत ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंडिजच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. वेस्ट इंडिजची दियांद्रा डॉटिन (६२) वगळता एकही खेळाडूने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर बाद झाला. डॉटिन आणि मॅथ्यूज यांनी सुरुवातीला मैदानावर चांगले पाय रोवले होते. त्यानंतर मात्र इंडिजची कोणतीही जोडी खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. त्यामुळे भारताचा १५५ धावांच्या फरकाने विजय झाला.
भारताने प्रथम फलंदाजीला उतरत दमदार खेळ दाखवला. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या जोडीने मैदानावरील आपली पकड घट्ट करत दमदार असा शतकी खेळ केला. स्मृती मानधनाने ११९ चेंडूंमध्ये १३ चौकार तसेच २ षटकार लगावत १२३ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकार यांच्या जोरावर १०९ घावा केल्या. अवघ्या ४९ धावांवर भारताला यास्तिका भाटियाच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर ५८ आणि ८७ धावांवर भारताचा दुसरा आणि तिसरा गडी बाद झाला. त्यानंतर मात्र स्मृती मानधना आणि हरमनप्रित कौर यांनी दीडशतकी भागिदारी केली. भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर ५० षटकांत आठ गडी गमवत ३१८ धावांचे आव्हान उभे केले.
भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. तगड्या गोलंदाजीच्या जोरावरच भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या पूर्ण संघाला अवघ्या १६२ धावांमध्ये तंबूत पाठवले. गोलंदाजीमध्ये स्नेह राणाने तीव बळी घेत भारताला विजयाकडे नेले. तिने ९ षटकांमध्ये २२ धावा देत इंडिजचे तीन गडी बाद केले. त्यानंतर मेघना सिंघने ६ षटकांत २७ धावा देत २ गडी बाद केले. पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी एका फलंजाला बाद केले.




