मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस टोचून घेणं कौतुकास्पद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आसाम, पुदुचेरी आणि केरळचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा पेहराव आणि इतर सर्व गोष्टी प्रतिकात्मक राजकारणाचा भाग असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत म्हटलं कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीकडे राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवे. राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सरळमार्गी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस टोचून घेतल्यामुळे आता जनतेत विश्वास निर्माण होईल. या लसीमुळे आपले रक्षण होईल, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल.” पंतप्रधानांची ही कृती कौतुकास्पद असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.




