उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती नऊ दिवसांनी जिवंत परतली. आता पोलिस प्रशासन निरुत्तर आहे की ज्याचे अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? बेवारस मिळालेल्या त्या मृतदेहाचं ना शवविच्छेदन केलं होतं, ना त्याचा व्हिसेरा ठेवला होता.
ही घटना राजसमंद जिल्हा येथील आहे, तिथे गाडोलिया लोहारांची कुटुंबे वर्षानुवर्षे रस्त्यावर राहतात. या वस्तीत औंकारलाल गाडोलिया हे कुटुंबासह राहतात. दहा दिवसांपूर्वी 12 मे रोजी पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस मृतदेह आढळला. या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तीन दिवसांनंतर औंकारलाल यांचा धाकटा भाऊ नाना लाल यांनी हा मृतदेह त्याचा मोठा भाऊ औंकारलालचा आहे, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन न करताच तो मृतदेह नानालाल यांच्याकडे सोपविला. त्यांच्या कुटुंबीयांनी 15 मे रोजी मृतदेहावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. औंकारलाल यांच्या तिन्ही मुलांनी मुंडण देखील केले.
अंत्यसंस्कार केल्यानंतर नऊ दिवसांनी औंकारलाल अचानक घरी परतले. त्यांचा धाकटा मुलगा त्यांना भूत समजून घाबरून पळून गेला. मात्र, औंकारलाल यांच्या पत्नीने त्यांना ओळखले आणि आंघोळ करायला सांगून चांगले कपडे दिले. औंकारलालला जिवंत पाहून एकीकडे कुटूंबाला खूप आनंद झाला. तर राजसमंद पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कुटुंबीयांच्या विनंतीवरून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आता केवळ त्या मृतदेहाचा फोटो त्याच्या ओळखीचा आधार आहे. त्याच्यावरूनच तो मृतदेह कोणाचा होता, हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
औंकारलाल यांनी सांगितले की ते 12 मे रोजी उदयपुर येथे गेले होते. तिथे अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी स्वत: ला महाराणा भुपाल रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा ते आजारातून बरे झाले, तेव्हा तेथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या फोटोवर हार लावण्यात आला होता. त्यांच्या तिनही मुलांनी मुंडन केले होते आणि त्यांचा धाकटा मुलगा त्यांना भूत समजून पळून गेला होता.
फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह




