राजस्थान : राजस्थानमधील अलवर येथील हमीरपूर गावात काही मुलींनी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चोप दिल्याची घटना घडली आहे. रोज-रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या मुलींनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अलवर जिल्ह्यातील हरसौरा पोलिस स्टेशन परिसरातील हमीरपूर गावातील आहे. काही तरुणांच्या दररोजच्या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या मुलींनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे. या मुलींनी आरोपी तरुणांना चोप दिला, त्यानंतर तरुणांविरूद्ध हरसौरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (६ जून) सायंकाळी काही मुली आपल्या शेतात गेल्या होत्या. त्यांना पाहून चार-पाच तरुणही तेथे आले आणि त्यांनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. ही या तरुणांची पहिली वेळ नव्हती. हे तरुण नेहमीच या मुलींना अशा प्रकारचा त्रास देत होते. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर या मुलींनी रविवारी संध्याकाळी या आरोपी तरुणांना मारहाण करून धडा शिकविला.
या मुली म्हणाल्या की काही तरुण नेहमी त्यांच्याशी छेडछाड आणि गैरवर्तन करीत होते. त्यांना बर्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण या तरुणांनी त्यांच्या सवयी सोडल्या नाहीत. मग आम्ही त्यांना धडा शिकवण्याचा विचार केला आणि चोप देऊन त्यांना पळ काढण्यास भाग पाडले. मुलींच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेकदा या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले आणि दिवसेंदिवस त्यांची छेडछाड वाढतच चालली होती.
हरसौरा पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या कुटुंबियांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांनी या तरुणांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपी तरुणांना लवकरच अटक करण्यात येईल.




