केरळ : केरळमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (Amoebic Meningoencephalitis) या दुर्मिळ परंतु जीवघेण्या मेंदूच्या संसर्गाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा आजार प्रामुख्याने Naegleria fowleri नावाच्या सूक्ष्म अमिबामुळे होतो. ह्यालाच मेंदू खाणारा अमिबा (Brain-eating amoeba) म्हणतात. तिरुवनंतपुरममधील १७ वर्षीय मुलाला या आजाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत अक्कुलम टुरिस्ट व्हिलेज येथील स्विमिंग पूल बंद केला असून चाचणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत. संबंधित मुलगा आपल्या मित्रांसोबत या तलावात गेल्याचे आणि तेथे आंघोळ केल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाढती आकडेवारी चिंताजनक
१४ सप्टेंबर रोजी एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमांतर्गत (IDSP) जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, केरळमध्ये यंदा तब्बल ६७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच या आजारामुळे पाच मृत्यू नोंदवले गेले आहेत.
आरोग्यमंत्र्यांचा इशारा आणि सूचना
केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या आजाराविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्या म्हणाल्या, “आपल्याला अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीसविरुद्ध मजबूत संरक्षण उभारणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याची सुरक्षितता आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहावे. साचलेल्या किंवा प्रदूषित पाण्यात, विशेषतः ज्या ठिकाणी गुरेढोरे आंघोळ करतात अशा जलाशयांमध्ये चेहरा धुणे अथवा पोहणे टाळावे.”
- विहिरी शास्त्रोक्त पद्धतीने क्लोरीनयुक्त ठेवाव्यात.
- वॉटर थीम पार्क व स्विमिंग पूल योग्यरित्या क्लोरीनयुक्त करून त्यांच्या देखभालसंबंधी नोंदी सुरक्षित ठेवाव्यात.
- घरांमध्ये पाणी साठवण्याची सोय स्वच्छ ठेवावी.
- अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो, त्यामुळे पाणी नाकात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
काय आहे अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस?
हा संसर्ग नॅग्लेरिया फाउलेरी (Naegleria fowleri) या सूक्ष्म अमिबामुळे होतो. तो सहसा दूषित किंवा साचलेल्या पाण्यात आढळतो. संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या मेंदूत तीव्र दाह होतो, ज्यामुळे डोकेदुखी, उलट्या, ताप, मान आखडणे, गोंधळ, झटके अशी लक्षणे दिसतात. ह्यालाच सामान्य भाषेत “मेंदू खाणारा अमिबा” म्हणतात. बहुतेक वेळा हा आजार जीवघेणा ठरतो.
राज्यात या आजाराच्या वाढत्या प्रकरणांनी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, पाणी वापरण्यात दक्षता, स्वच्छता व नियमित क्लोरीनची मात्रा राखणे हेच सध्या सर्वात मोठे प्रतिबंधात्मक पाऊल आहे.




