स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथील शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे. शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे. फाशीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज स्वीकारलेला नाही. त्यामुळेच आता तुरुंग प्रशासनाने शबनमला फाशी देण्याची तयारी सुरु केली आहे.
काय आहे प्रकरण ?
अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमसोबतच्या तिच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १5 एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची कुऱ्हाडीने हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. शबनमने नंतर आपल्या लहान भाचालाही गळा आवळून मारुन टाकलं.
अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्ष तीन महिने चालली. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती एस. ए. ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली. शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल १०० दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने २९ साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. १४ तारखेला साक्षीदार आणि पुरावे सादर करुन झाल्यानंतर पुढच्या दिवशीच अवघ्या २९ सेकंदांमध्ये न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान १६० पानांचा निकाल न्यायालयाने दिला होता.
मथुरामधील तुरुंगामध्ये १५० वर्षांपूर्वी महिलांना फाशी देण्यासाठी हे विशेष फाशीघर तयार करण्यात आलं. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधीक्षक असणाऱ्या शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार फाशी कधी देण्यात येणार हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांच्या बाजूने संपूर्ण तयारी करुन ठेवली आहे. डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर शबनमला लगेच फासावर चढवण्यात येईल असं मैत्रेय यांनी सांगितलं आहे.