नवी दिल्ली : कोरोना संक्रमणानं देशात अगदी भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. भारतात कोरोना संक्रमणाचे आकडे दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारी २४ तासांत एकूण २ लाख ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर १०३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचली असून आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआर (ICMR)नं दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी देशात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.




