अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अधिक निधी देण्यास मी वचनबद्ध आहे, असंदेखील त्या पुढे म्हणाल्या.
केंद्र सरकारने 100 हून अधिक देशातील लोकांना कोरोनाविरुद्ध सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना श्रेय देत या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली. या व्यतिरिक्त त्या म्हणाल्या की 2020-21 या आर्थिक वर्षात सरकारने 4.21 लाख कोटी रुपये खर्च केले. 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटीवरून 2.38 लाख कोटी करण्यात आले आहे. यामुळे देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील.




