झारखंड : रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला अडकले आहेत. तीन वर्षांपूर्वीच ग्रामविकास विभागाकडून 13 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. पुलाचे खांब उभे करताना कोणतीही दाखल न घेता ते खांब दलदलीत उभे केले होते, ज्यामुळे पुलाचा पाया कमजोर होता. त्यातच हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच पूल कोसळण्याचे कारण नदीतून दररोज होणारे वाळूचे अवैध उत्खनन देखील असल्याचे सांगितले जात आहे. वाळू तस्कर पुलाच्या भोवती जेसीबी लावून वाळू उत्खनन करत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी पूल कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पाहणी केली. ते म्हणाले कि, “यापूर्वी देखील असाच एक उच्चस्तरीय पूल कोसळला असून दोन्ही पुलांचे बांधकाम करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई करायला हवी. अवैध वाळू उत्खननामुळे यापूर्वी देखील दोन पूल कोसळले आहेत. आता हा तिसरा पूल कोसळला आहे.




