मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असे टास्क फोर्समधील डॉक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे मत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांनी ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेदेखील सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.