ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद पाटील हे पत्नी प्रीती आणि दोन मुलींसोबत डोंबिवलीतील भोपर परिसरात राहत होते. प्रसाद हा त्याच्या पत्नीचा अनेकदा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी प्रसाद यांच्या घराला आग लागली, यात प्रसाद, त्याची पत्नी प्रीती आणि दोन मुली भाजल्या. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान प्रितीचा मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. प्रसादवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तपास मानपाडा पोलीस करत होते. कौटुंबिक वादातून प्रसादने पत्नी प्रीतीला पेटवून दिल्याचे तपासात समोर आले आहे. प्रसादने प्रीतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर गुन्हेगाराने पोलिसांची दिशाभूल केली. घराला आग लागल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांना संशय आला आणि त्यांनी प्रसादची कठोरपणे चौकशी केली असता सत्य समोर आले. तक्रारदार किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी प्रसाद पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.