पुणे : राज्य सरकारने राज्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील केले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगीही मिळाली आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
१५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय, शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेनं प्रवास करावा लागतो. परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळं त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेऊन दोन डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात इतरत्रही रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2021