मुंबई : महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढला. महाराष्ट्रातही सरकारने असाच तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात अशांतता निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे.
यावेळी संजय राऊत यांना १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या सभेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची किती मोठी सभा झाली, पाहिली नाहीत का? १ मे रोजी महाराष्ट्रात सहा सभा आहेत. महाराष्ट्राला सभांचं वावडं नाही. ते पुढे म्हणाले की भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न होत आहे. राज ठाकरे यांनी योगी कोण आणि भोगी कोण, हे सांगितले आहे. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करता येईल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदीवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक आभार असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. ते पुढे म्हणाले होते कि, “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022




