शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त खास अग्रलेख लिहून शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाशी करण्यात आली आहे. ‘यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते.
‘महाराष्ट्रातील काँगेस पक्षात मागच्या ७० वर्षांत खूप मोठे नेते निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत,’ असा दावा शिवसेनेनं केला आहे.
यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्याला कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे,’ असं देखील शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘८० वर्षांचे होऊनही पवारांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. ‘कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेला लोकप्रिय नेता’, असं शरद पवारांचं वर्णन शिवसेनेनं केलं आहे.




