पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. परंतु, पायी वारी सोहळ्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले की, “वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. अशातच काल (१० जून) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या 10 मानाच्या पालख्यांना 20 बसच्या माध्यमातून पंढरपुरात जाता येणार आहे. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांनाच वारीची मुभा देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही विठुरायाचं मंदीर भाविकांसाठी बंदच असणार आहे. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक असणार आहे. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.




