मुंबई : नव्या व्हॅरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढला असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हॅरिएंट अत्यंत घातक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्यासाठी पाच स्तर निश्चित केले होते. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारे हे स्तर ठरविले होते. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी सवलती मिळाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका वाढला असून रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हॅरिएंट अत्यंत घातक असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने नवे आदेश काढले आहेत.
नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे की कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली, तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्या दरम्यान स्थानिक प्रशासनाला आपापल्या जिल्ह्याचा स्तर ठरवता येणार आहे. अधिकचे निर्बंध लादण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, निर्बंध कमी करताना दोन आठवड्यांच्या आकडेवारीच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल. नव्या आदेशामुळे सध्या पहिल्या व दुसऱ्या स्तरावर असलेले जिल्हे थेट तिसऱ्या स्तरावर आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्वांना पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर निश्चित करताना याआधी अँटिजन आणि आरटी-पीसीआर या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचे रिपोर्ट ग्राह्य धरले जात होते. आता यात बदल करण्यात आला असून यापुढे केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट ग्राह्य धरले जाणार आहेत.




