पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हटले कि, कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले कि, मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतेय. सारखा झोपेतून उठतो आणि बघतो पडले की काय हे सरकार, अशा शब्दांत अजित पवार यांनी पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे, अमके आहे तमके आहे. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचे. आपलं दुरून डोंगर साजरे, असे म्हणतानाच मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. जो पर्यंत तीन नेते एकत्र आहेत तो पर्यंत हे सरकार कधीही पडणार नाही, असे अजित पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा ठामपमे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आषाढी वारीसंदर्भातही एक बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीबाबत माहिती देताना पवार यांनी सांगितले की, कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचे संकट वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. वारकऱ्यांनाही ते समजावून सांगण्यात आले. असे वारीमध्ये घडू नये यासाठी पालखी सोहळ्याबाबत विचार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर वारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.




