पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून अपघात झाला, यात पिकअप महामार्गावर पलटी झाला. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला.
याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.
काहीच दिवसांपूर्वी, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रक चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली होती. या अपघातात ४७ गाड्यांचं नुकसान झालं होतं.